Wednesday, February 28, 2007

शामलाल यांना गुगली!

' टाइम्स ऑफ इंडिया'चे भूतपूर्व संपादक शामलाल यांचे नुकतेच निधन झाले. या दैनिकात त्यांचे 'लाइफ अँड लेटर्स' हे साप्ताहिक सदर बुधवारी प्रसिद्ध होत असे. जगात नव्याने विशेष गाजत असलेल्या साहित्यकृतींचे परीक्षण त्या सदरात येत असे. देशाबाहेर महत्त्वाचे काही चालले असल्यास ते भारतवासीयांना प्रथम समजावून देण्याचा अधिकार आपलाच आहे असे ते समजत. त्यांना एका पत्रकाराने यशस्वी गुगली टाकली त्याची ही गोष्ट. बोरिस पास्तरनाक या ख्यातनाम रशियन लेखकाची डॉ. झिवागो या आत्मचरित्रात्मक नोबेल विजेत्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रती मुंबईत स्टँड बुक स्टॉलमध्ये पोचल्या. त्यावेळी 'इंडियन एक्सप्रेस'मधील एक पत्रकार मोहन राव तेथे उपस्थित होते. तो शनिवार होता. आलेल्या प्रतींपैकी 'टाइम्स' व 'एक्सप्रेस' यांना एकेक द्यायची होती. 'लाइफ अँड लेटर्स'सारखे ग्रंथ समीक्षणाचे राव यांचे सदर शुक्रवारी 'एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध होत असे. डॉ. झिवागोची प्रत 'टाइम्स'मध्ये सोमवारी दिली, तर त्यावर बुधवारच्या अंकात शामलाल लिहिणार हे उघड होते. यास्तव, दोन्ही दैनिकांना गुरुवारी प्रती द्या, अशी विनंती राव यांनी बुक स्टॉलचे मालक शानभाग यांना केली. ते व राव दोघे कोकणी असल्यामुळे त्यांचे सख्य होते. मग राव यांनी एक प्रत घरी नेली आणि सोमवारी परत आणून दिली. पुढे शानभागांनी त्या प्रती गुरुवारी दोन्ही दैनिकांना पाठवून दिल्या. दुसऱ्या दिवशी शामलाल पाहतात तर 'एक्सप्रेस'मध्ये डॉ. झिवागोवर समीक्षण प्रसिद्ध झाले होते. त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी शानभाग व 'एक्सप्रेस'चे त्यावेळचे संपादक फ्रँक मोराइस यांच्याकडे चौकशी केली असता, त्या प्रती गुरुवारीच वाटण्यात आल्या होत्या, याबद्दल त्यांची खात्री झाली. त्याचबरोबर मोहन राव यांनी चांगलीच कुरघोडी केली हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले.
शां. मं. गोठोसकर, वडाळा.
Click here to read this letter on Maharashtratimes.com

Thursday, February 15, 2007

राज ठाकरे हरले की जिंकले?

शां. मं. गोठोसकर

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांना कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता येणार नाही, एवढे यश मनसेने या निवडणुकीत संपादन केले आहे. राज ठाकरे यांचे बंड फसले आणि मनसेचा या निवडणुकीत फज्जा उडाला, असा निष्कर्ष या निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांनी काढला, ते कसे चूक होते, हे यावरून लक्षात येईल.

महाराष्ट्रातील दहा महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. राज्यातील एकूण मतदारांपैकी २६ टक्के या निवडणुकांत मतदानास पात्र होते. राजधानी, उपराजधानी, सांस्कृतिक राजधानी (पुणे) आणि अन्य महत्त्वाच्या व राज्यभर पसरलेल्या शहरांच्या या महापालिका होत्या. या दृष्टीने बघितल्यास ही सर्व अर्थाने विधानसभेची छोटी निवडणूकच होती. त्यामध्ये कोणत्या पक्षांना विजय मिळाला आणि कोणाला पराभव पत्करावा लागला, याबाबत बराच काथ्याकूट झाला. तो सर्व कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, यावर आधारित होता. याउलट, पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी किंवा दिलेली मान्यता रद्द करण्यासाठी लोकसभा-विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मते किती मिळाली, याचाच विचार केंदीय निवडणूक आयोग प्रामुख्याने करतो. आयोगाच्या दृष्टिकोनातून या निकालांचे विश्लेषण केले, तर काही वेगळेच चित्र बघावयास मिळते.

भारतात केंदीय निवडणूक आयोगाकडे ८७५ राजकीय पक्ष नोेंदलेले आहेत. त्यापैकी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट अशा सहा पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्या प्रत्येकाला खास निवडणूक चिन्ह दिलेले असते. हे पक्ष लोकसभेच्या वा विधानसभेच्या सर्व जागांसाठी उमेदवार उभे करू शकतात. त्या व्यतिरिक्त ४३ पक्षांना राज्य पातळीवरचे पक्ष म्हणून मान्यता आहे. त्यातील काही पक्षांना एकाहून अधिक राज्यांसाठी मान्यता मिळालेली आहे. त्यांनाही खास निवडणूक चिन्ह दिलेले असते.

महाराष्ट्रात मुख्य वा केंदीय कार्यालय असलेले एकूण ५६ राजकीय पक्ष असले, तरी राज्य पातळीवरचा पक्ष म्हणून फक्त शिवसेनेला मान्यता आहे. अन्य राज्यात अशी मान्यता असलेल्या एकाही पक्षाला महाराष्ट्रासाठी हा दर्जा नाही. तथापि, मान्यता नसलेल्या किती तरी पक्षांनी या १० महापालिकांच्या निवडणुकीत भाग घेतला होता.

राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळायला पाहिजेत आणि किमान दोन उमेदवार निवडून आले पाहिजेत. अर्थात, याला एक पर्यायही आहे. विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या किमान तीन टक्के एवढे त्या पक्षाचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. महाराष्ट्रात ही संख्या नऊ एवढी होते. या १० महापालिकांच्या निवडणुकीतील एकूण वैध मतदानात फक्त पाच पक्षांना सहा टक्क्यांहून अधिक मते मिळाली. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. शिवसेनेलाही त्या मर्यादेहून बरीच जास्त मते मिळाली आहेत.

पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांनी स्थापन केलेला 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हाही त्या पाच पक्षांपैकी एक पक्ष आहे. या पक्षाला ८.५६ टक्के मते मिळाली आहेत. केवळ दहा महिन्यांपूवीर् स्थापन झालेल्या या पक्षाने मतांची किमान मर्यादा सहजपणे ओलांडली हे विशेष होय. या निवडणुकीत या पक्षाला तीन टक्के जागा मिळाल्या, ही बाबसुद्धा येथे ध्यानात घ्यायला हवी. मनसेच्या खालोखाल समाजवादी पक्षाचा क्रमांक लागला. त्याला केवळ अडीच टक्के मते मिळाली.

मनसेला केवळ दखल घेण्यापुरती मते मिळाली, असा याचा अर्थ नाही. इतर पक्षांशी तुलना करता, या पक्षाने चांगलीच मते मिळवली, असे ही आकडेवारी दाखवून देते. शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या निम्म्याहून थोडी जास्त मते मनसेच्या पदरात पडली. राष्ट्रवादीने कमावलेल्या मतांच्या ५३ टक्के मते मनसे मिळवू शकली. तर भाजपच्या पारड्यात पडलेल्या मतांच्या ७४ टक्के मते मनसेने हस्तगत केली आहेत. या सर्वाचा अर्थ असा की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांना कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता येणार नाही, एवढे यश मनसेने या निवडणुकीत संपादन केले आहे. राज ठाकरे यांचे बंड फसले आणि मनसेचा या निवडणुकीत फज्जा उडाला, असा निष्कर्ष या निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांनी काढला, ते कसे चूक होते, हे यावरून लक्षात यायला हरकत नसावी.

शिवसेना स्थापन झाल्यापासून पहिली २२ वर्षे सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे हेच घेत असत. पुढे त्या पक्षात राज ठाकरे सक्रिय झाल्यानंतर त्यांना काही अधिकार मिळाले. नंतर सहा वर्षांनी उद्धव ठाकरे रंगपटावर आले. नऊ वर्षांनी ते कार्याध्यक्षपदी विराजमान झाले. त्याचा परिणाम म्हणून राज ठाकरे वळचणीला पडले. मग त्यांनी काय करावे? धीरूबाई अंबानी यांच्या निधनानंतर ज्येष्ठ पुत्र मुकेश यांनी धाकटे बंधू अनिल यांना वळचणीला टाकले. वर्षभर तसे राहिल्यानंतर यशस्वी बंड करण्याएवढी आपली कुवत आहे, हे अनिलनी जाहीररीत्या व मोठ्या खुबीने सूचित केले. त्यानंतर आईला मध्यस्थी करायला भाग पाडून रिलायन्स उद्योग समूहाचे विभाजन घडवून आणले. राजकीय पक्षाचे तसे धडेवाटप होऊ शकत नाही. यास्तव, राज ठाकरे यांनी तीन वषेर् वाट पाहून बंड केले. शिवसेना सोडून त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला. या १० महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना एकत्र जेवढी मते मिळाली, त्याचा तिसरा हिस्सा एवढी राज ठाकरे यांच्या पदरात पडली. जनतेच्या न्यायालयात त्यांना रास्त हिस्सा मिळाला, असा याचा अर्थ घ्यायला हरकत नाही. मान्यताप्राप्त पक्ष होण्यासाठी लागू असलेल्या सर्व शर्ती विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीत मनसे सहजरीत्या पुऱ्या करील, असे गृहीत धरायला हरकत नाही.

राजकीय पक्ष सोडून बंड केले आणि नवा पक्ष स्थापन केला, असे महाराष्ट्रात आतापर्यंत चार-पाच प्रकार झाले. शंकरराव चव्हाणांनी १९७८ साली, पुढच्या वषीर् नासिकराव तिरपुड्यांनी व १९८४ साली अंतुल्यांनी वेगळे काँग्रेस पक्ष स्थापन केले होते; पण त्यांचा टिकाव लागू शकला नाही.

काँगेसपासून दूर होऊन फक्त शरद पवारच टिकून राहू शकले. खरे म्हणजे सबंध देशात काँग्रेसचा त्याग करून वेगळा पक्ष काढला आणि पुरून उरले असे हे एकच उदाहरण आहे. राज ठाकरे यांचे आताचे यश हे पवारांसारखेच आहे. राष्ट्रवादीचा त्याग करून जनसुराज्य शक्ती हा पक्ष स्थापन करून चार उमेदवार विधानसभेवर निवडून आणणाऱ्या विनय कोरे यांचे यश त्यामानाने मर्यादित म्हणावे लागेल.

या यशामुळे महाराष्ट्रातील पहिल्या दहा प्रमुख राजकारणी व्यक्तींमध्ये राज ठाकरे यांची गणना करावी लागते. राजकीय ताकदीनुसार त्यांचा क्रम असा- शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, नारायण राणे, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे आणि आर. आर. पाटील. राज ठाकरे यांनी बंड करून वेगळा पक्ष स्थापन केला नसता, तर महाराष्ट्रातील पहिल्या २५ राजकारणी व्यक्तींमध्ये त्यांची गणना झाली नसती. त्यांना अजून किमान ३५ वषेर् राजकारण करायचे आहे. त्यामुळे मनसेची ताकद वाढविण्यासाठी ते पुढे कोणती पावले टाकतात, याकडे राजकीय निरीक्षकांनी लक्ष ठेवायला हवे.

Wednesday, January 24, 2007

मुंबईच्या प्रश्ानंकडे दुर्लक्ष

शां. मं. गोठोसकर

रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे मुंबईर्त येत राहिल्यास, कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी महापालिका किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा, अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला, तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करावी.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रस्तृत केलेल्या जाहीरनाम्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या मूलभूत बाबीकडे लक्ष दिलेले दिसत नाही. या महानगरात नागरी सुविधा पुरविणे ही महापालिकेची मुख्य जबाबदारी आहे. पण येथे रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे स्थायिक होण्यासाठी येत राहिल्यास, महापालिकेला कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी ती किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. या देशातील ''सर्व नागरिकांस भारताच्या कोणत््याही राज्यक्षेत्रात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार असेल'', असे राज्यघटनेच्या १९व्या कलमात म्हटलेले आहे. तथापि, सार्वजनिक हितार्थ त्यावर मर्यादा घालण्याचा कायदा सरकारला करता येईल, असेही त्यामध्ये सांगितले आहे. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी.

मुंबईच्या विकासखर्चाला पैसा फार अपुरा पडतो. त्यासंबंधात राज्य सरकारपुढे घटनात्मक अडचण आहे. महाराष्ट्रात विकासखर्चाचे वाटप कसे करायचे याचा दंडक राज्यघटनेच्या ३७१ कलमाने घालून दिला आहे. त्यामध्ये या राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित (म्हणजे पश्चिम) महाराष्ट्र असे तीन प्रदेश कल्पिले असून त्यांवर समन्यायानुसार खर्च झाला पाहिजे, असे सांगितले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीतून मुंबईचा विकासखर्च भागवायचा, असा याचा अर्थ होतो. राज्य सरकारच्या महसुलात मुंबई महानगर प्रदेशाचा हिस्सा ८० टक्क्यांहून अधिक आहे. असे असताना त्याच्या विकासखर्चासाठी लागणारे पैसे मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या हिश्श्यातून घ्यायचे, हीच बाब मुळात समन्यायानुसार नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीपैकी बराच मोठा भाग या प्रदेशातील विशेष राजकीय ताकद असलेले जिल्हे आपल्याकडे ओढून घेतात. त्यामुळे मुंबईच्या वाट्याला किमान आवश्यक एवढासुद्धा निधी मिळू शकत नाही. मग कोकणच्या वाट्याचे पैसे मुंबईवर खर्च करायचे, असा हा प्रकार गेली ४६ वषेर् चालू आहे. प्राथमिक शिक्षणावरील खर्च ही राज्य सरकारची जबाबदारी असते. मुंबई महापालिका त्यावर वर्षाकाठी चारशे कोटी रुपये खर्च करते. त्यातील काहीसुद्धा हिस्सा महाराष्ट्र सरकार उचलत नाही. मग रस्त्यांसाठी खर्च करायचे काही पैसे प्राथमिक शिक्षणावर खर्च केले जातात. अशा परिस्थितीत रस्त्यात खड्डे पडणार नाहीत तर काय होणार? हा अन्याय दूर होण्यासाठी महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, मुंबई महानगर प्रदेश, उर्वरित कोकण व उर्वरित पश्चिम महाराष्ट्र असे पाच विभाग कल्पिले पाहिजेत. मुंबई महानगर प्रदेशावर रास्त विकासखर्च करून बाकीच्या निधीचे उर्वरित चार विभागांवर समन्यायानुसार वाटप व्हावयास हवे. अशी व्यवस्था झाली तरच राज्य सरकारच्या तिजोरीतून अन्याय न होता मुंबईसाठी पैसा मिळू शकेल.

लोंढे वाढून दिल्ली बकाल होऊ नये म्हणून तिच्या आसमंतासह प्रदेशाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी प्रदेश कल्पिण्यात आला. त्याकरिता केंद सरकारच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो. या सरकारच्या तिजोरीत सर्वात जास्त भर मुंबईतून पडत असते. याचे कारण हे महानगर ही भारताची आथिर्क राजधानी आहे. यास्तव, मुंबई महानगर प्रदेश हा राष्ट्रीय आथिर्क राजधानी प्रदेश आहे, असे कल्पून त्याच्या विकासासाठी केंद सरकारच्या तिजोरीतून निधी उपलब्ध व्हावयास हवा. हे साध्य होण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्ताव मांडून त्यासाठी जोर लावला पाहिजे. पण जाहीरनामे पाहता, निधी उपलब्ध करणे ही बाब कोणाच्याही गावी नाही असे दिसते. अन्य महानगरांतील उपनगर रेल्वे तोट्यात असून मुंबईची नफ्यात आहे. इतर ठिकाणचा तोटा मुंबईने भरून द्यायचा असा हा प्रकार आहे. आता तर इतर ठिकाणांपेक्षा मुंबईचे रेल्वेचे दर वाढवायचे असा विचार चालला आहे. हे टाळण्यासाठी आणि या उपनगर रेल्वेचा पुरेशा गतीने विकास होण्यासाठी तिच्याकरिता वेगळे महामंडळ स्थापन होण्याची गरज आहे. त्यासाठी रेटा लावणे ही गोष्ट महापालिकेलाच करावी लागेल, कारण राज्य सरकारचे त्याकडे लक्षच नाही.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात भर घालण्यासाठी मध्य वैतरणा प्रकल्प आता हाती घेण्यात येत आहे. ऊर्ध्व वैतरणा प्रकल्पाचे पाणी पूवेर्कडे वळवून गोदावरी नदीच्या खोऱ्यात सोडावे अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून चालू आहे. त्या खोऱ्यात नेहमीच पाण्याची तीव्र टंचाई असते हे लक्षात घेता, ती मागणी मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. ती मान्य झाल्यास मध्य वैतरणा प्रकल्प रद्द करावा लागेल. महाराष्ट्र पाणी परिषदेचे अध्यक्ष आणि माजी केंदीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील आणि औरंगाबादचे तरुण तुर्क कृष्णा डोणगावकर या प्रश्ान्ी पुढाकार घेऊन रान उठवतील हे निश्चित. जो प्रकल्प पुढे रद्दच होणार आहे, त्यामागे जाण्यात हशील काय? मुंबईकरिता आणखी पाणी उपलब्ध करण्यासाठी अन्य तीन-चार प्रकल्पांचे अंतिम आराखडे तयार आहेत. ते अमलात आणण्याचा विचार एकाही जाहीरनाम्यात नाही, ही खेदाची गोष्ट होय.

नजीकच्या भविष्यकाळात मुंबईवर एक नवे संकट येऊ घातले आहे. केंद सरकार लवकरच दुसरा राज्यपुनर्रचना आयोग नेमणार आहे. असा पहिला आयोग १९५३ साली नेमण्यात आला, तेव्हा मुंबई महानगराचे वेगळे राज्य व्हावे, अशी येथील बहुतेक साऱ्या बिगरमराठी मंडळींची इच्छा होती. त्यांचे खरेखुरे नेतृत्व इंडियन मर्चंट्स चेंबरकडे होते. त्या संस्थेची सध्या शतसंवत्सरी साजरी होत आहे. ती पुन्हा उचल खाणार नाही, याची हमी काय? या महापालिकेत मराठीऐवजी हिंदीचा वापर व्हावा अशी मागणी बिगरमराठी नगरसेवक सातत्याने करीत असतात. मुंबई महापालिकेच्या १९८५ सालच्या निवडणुकीत कमीत कमी मराठी व जास्तीत जास्त बिगरमराठी उमेदवार उभे करावे आणि काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर वेगळ्या राज्याचा ठराव करायचा असे मुंबई काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी गुप्तपणे योजले होते. महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी योग्य ती पावले टाकली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचा पराभव झाला आणि या महापालिकेत शिवसेनेला प्रथमच बहुमत प्राप्त झाले. याबद्दल शिक्षा म्हणून वसंतदादांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले, ही गोष्ट वेगळी! भारतातील दहा राज्ये लोकवस्तीने मुंबईहून लहान आहेत. तसेच, जगातील १९२ पैकी १२६ राष्ट्रे लोकवस्तीने मुंबईहून छोटी आहेत. जगात महानगरांची वेगळी राष्ट्रे व राज्ये असल्याची उदाहरणे आहेत. दुसऱ्या राज्यपुनर्रचना आयोगाकडे बिगरमराठी मंडळी या दिशेने युक्तिवाद करतील. मुंबईचे वेगळे राज्य व्हावे अशी कोणी मागणी केल्यास आपला तिला पाठिंबा राहणार नाही, असे सर्व पक्षांकडून- विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप यांच्याकडून आता जाहीर करून घेणे आवश्यक आहे.

मुंबईकरांनी सतर्क, दक्ष व जागरूक राहून, राजकीय पक्षांना आपल्या जाहीरनाम्यांमध्ये पुरवणी म्हणून वर सुचविलेल्या बाबी समाविष्ट करणे भाग पडले पाहिजे.

Tuesday, December 26, 2006

शालिनीताईंचा 'सुसंस्कृत'पणा!

खैरलांजीत दलित हत्याकांडात मरण पावलेल्या स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल शालिनीताई पाटील यांनी शंका व्यक्त केली आहे. याबाबत पूवीर्ची एक आठवण अप्रस्तुत ठरणार नाही. लोकसभेच्या १९८० साली झालेल्या निवडणुकीत सातारा मतदारसंघात यशवंतराव चव्हाण काँग्रेस(एस)चे तर शालिनीताई काँग्रेस(आय)च्या उमेदवार होत्या. त्यावेळी मुंबईतील तेव्हाच्या समाजवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेने शालिनीताईंच्या चारित्र्याबद्दल शंका व्यक्त केली होती. त्यावर शालिनीताई म्हणाल्या, 'स्त्रीच्या चारित्र्याविरुद्ध बोलणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे समाजात मानले जाते.' आता पंचाहत्तरीला पोचलेल्या शालिनीताईंना वयोपरत्वे याचे विस्मरण झाले आहे की फक्त सवर्ण स्त्रीच्या चारित्र्याविरुद्ध बोलणे हा असंस्कृतपणा आहे, असे त्यांना मुळात म्हणायचे होते?

शां. मं. गोठोसकर, वडाळा.

Wednesday, November 22, 2006

चीनला हवे ब्रह्मापुत्रेचे पाणी!

शां. मं. गोठोसकर

नद्यांच्या आंतरराष्ट्रीय तंट्यांचा विचार करता ब्रह्मापुत्रेबाबत चीनला अडविण्यासाठी भारत व बांगलादेश यांना कसलाही कायदेशीर आधार नाही. याउलट, चीनने तसे धरण बांधले तर ब्रह्मापुत्रेच्या महापुराने दरवषीर् आसामात हाहाकार माजतो, तो बराचसा संपुष्टात येईल. या नदीला वर्षातील तीन महिने पाणी कमी असते. चीनच्या त्या धरणामुळे ते आणखी कमी होण्याचा धोका संभवतो. तो टाळण्यासाठी चीनशी बोलणी करता येतील.

चीनने तिबेट प्रदेशात ब्रह्मापुत्रेवर अतिप्रचंड धरण उभारण्याचे योजले असून, त्याचा वापर पाण्याचे दुभिर्क्ष असणाऱ्या आपल्या काही प्रांतांसाठी करायचा असा त्या राष्ट्राचा संकल्प आहे अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. या संकल्पामुळे भारत व बांगलादेश यांची धाबी दणाणली आहेत, असेही त्यामध्ये म्हटले आहे. चीनने या वृत्ताचा इन्कार केलेला असला तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही. पहिले असे की, ५० वर्षांपूवीर् 'हिंदी चिनी भाई भाई' असा घोष झाल्यानंतर थोड्या काळाने चीनने भारतावर आक्रमण केले आणि नंतर भारत-चीन युद्धही झाले. दुसरे म्हणजे चीनने तिबेटमध्ये सतलज नदीवर मोठे धरण बांधले. ते पुरे होऊन पाण्याने पूर्ण भरले तेव्हाच आपल्या देशाला त्याचा पत्ता लागला. त्यापूवीर् चीनने भारताला त्याचा सुगावासुद्धा लागू दिला नव्हता. अजूनही त्या संबंधात चीन आपणाला कसलीही माहिती देत नाही. हे सर्व पाहता ब्रह्मापुत्रेचे पाणी वळविण्याच्या संकल्पाची वेळीच व आवश्यक तेवढी माहिती चीन देईल अशी अपेक्षा करता येत नाही.

त्या बातमीप्रमाणे ब्रह्मापुत्रेचे वर्षाकाठी २०० अब्ज घनमीटर पाणी वळविण्याचा चीनचा संकल्प आहे. आपल्याकडे धरणांच्या जलाशयांचे आकडे अब्ज घनफुटांचे आहेत. त्यानुसार चीनचा, प्रस्तुत आकडा ७००० अब्ज घनफुटांचा होतो. त्याच्याशी तुलना करता आपल्या धरणांच्या जलाशयांचे आकार अब्ज घनफुटांमध्ये पुढीलप्रमाणे आहेत. खडकवासला साडेतीन, पानशेत दहा, कोयना १००, उजनी ११७, सरदार सरोवर ३७५, इंदिरासागर ४५० वगैरे. हे पाहता पानशेतच्या सातशेपट तर सरदार सरोवराच्या २० पट एवढे ब्रह्मापुत्रेचे पाणी चीन वापरणार आहे. त्या देशाने एवढे पाणी घेतले तर मग भारत व बांगलादेश यांचे काय?

भारतातील अन्य नद्यांच्या संदर्भात ब्रह्मापुत्रेला किती पाणी आहे ते पाहू. आपल्या अन्य नद्यांचे एकूण पाणी उपलब्धतेचे अब्ज घनमीटरमध्ये आकडे असे- गंगा ५०२, गोदावरी ९२, सिंधू ७३, महानदी ४८, नर्मदा ३५, कृष्णा २७, कावेरी ८.५, तापी ६.१८ वगैरे. ब्रह्मापुत्रेचे पाणी गंगेहून जास्त म्हणजे ५३७ अब्ज घनमीटर असून, त्यातील तीन अष्टमांशच पाणी त्या प्रकल्पासाठी लागेल. त्यामुळे भारत व बांगलादेश यांमधील प्रकल्पांना पाणी कमी पडेल असा प्रश्ान् येत नाही. कारण या दोन देशांचा ब्रह्मापुत्रेवर कसलाही प्रकल्प नाही. काही प्रकल्प वर्षानुवषेर् विचाराधीन आहेत एवढेच. नद्यांच्या आंतरराष्ट्रीय तंट्यांचा विचार करता ब्रह्मापुत्रेबाबत चीनला अडविण्यासाठी भारत व बांगलादेश यांना कसलाही कायदेशीर आधार नाही. याउलट, चीनने तसे धरण बांधले तर ब्रह्मापुत्रेच्या महापुराने दरवषीर् आसामात हाहाकार माजतो तो बराचसा संपुष्टात येईल. या नदीला वर्षातील तीन महिने पाणी कमी असते. चीनच्या त्या धरणामुळे ते आणखी कमी होण्याचा धोका संभवतो. तो टाळण्यासाठी चीनशी बोलणी करता येतील. त्यातून काही निष्पन्न झाले नाही, तर भारतातच ब्रह्मापुत्रेवर धरण बांधणे शक्य आहे.

ब्रह्मापुत्रा किंवा अन्य कोणत्याही नदीबाबत भारताचा चीनशी प्राथमिक स्वरूपाचा करारसुद्धा नाही. बांगलादेशाशी असा करार गंगेच्या पाण्याबाबत असून पाकिस्तानशी पक्का करार सिंधू नदीच्या पाण्याबाबत (ट्रीटी) आहे. भारत करारा-प्रमाणे वागत नाही अशी त्या दोन्ही देशांची तक्रार असते. संबंधित नद्यांमध्ये किती पाणी खरेखुरे उपलब्ध असते आणि त्यापैकी भारतात किती वापर होतो याची माहिती त्यांना हवी असते. ती किमान आवश्यक एवढी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार असते. आंतरराष्ट्रीय नदीवर कसलाही प्रकल्प नसेल तर पहिला प्रकल्प बांधणाऱ्या राष्ट्राला अन्य राष्ट्रे अडवू शकत नाहीत. चीनने ब्रह्मापुत्रेवर धरण बांधायला घेतले तर भारत ते अडवू शकणार नाही हे यावरून लक्षात यावे.

पाण्याच्या प्रश्नावरून भारतातील राज्यांच्या दरम्यान भांडणे चालूच आहेत. कर्नाटक व तामिळनाडू यांच्या दरम्यानचा कावेरीच्या पाण्याचा तंटा न मिटणारा आहे. कृष्णेवरील अलमट्टी धरणाच्या जलाशयामुळे सांगली-मिरज-शिरोळ भागात महापूर येतो व तो आठ-दहा दिवस मुक्कामाला राहतो ही बाब मान्य करायलाच कर्नाटक सरकार तयार नाही. गोदावरीचे समुदात वाया जाणारे पाणी आंध्र प्रदेशात मोठा कालवा बांधून कृष्णेत आणता येईल आणि त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक यांना कृष्णेच्या पाण्याचा अधिक वाटा मिळू शकेल हा प्रस्ताव आंध्र प्रदेश सरकारला मान्य नाही. सतलजचे पाणी कालव्याने यमुनेत आणून दिल्लीचा पाणीपुरवठा वाढवावा या गोष्टीला पंजाबचा विरोध आहे. गोव्यातील मांडवी नदी बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात उगम पावते. तेथे तिला म्हादई म्हणतात. गोव्याला न विचारता तेथे मोठे धरण बांधण्याचे काम कर्नाटकाने हाती घेतले असून, ते लवकरच पुरे होईल. कर्नाटकाला हे पाणी त्या नदीच्या खोऱ्याबाहेर वळवायचे आहे! या संबंधात कर्नाटक सरकार व केंद सरकार दाद देईनात म्हणून आता गोवा सरकार सवोर्च्च न्यायालयात गेले आहे. नद्या जोडण्याच्या मिशनचे प्रमुख म्हणून खासदार सुरेश प्रभू यांनी मन लावून विशेष प्रयत्न केले. तथापि, अपवाद वगळता बहुसंख्य राज्ये या गोष्टीला तयार दिसत नाहीत.

देशाप्रमाणे महाराष्ट्राच्या अंतर्गत पाण्यावरून भांडणे आहेतच. उर्ध्व वैतरणेचे पाणी सध्या मुंबई महानगरपालिकेला मिळते. ते सर्व पूवेर्कडे वळवून गोदावरी नदीत उपलब्ध करून द्यावे असे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे विशेष प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून चालू आहेत; पण अजून ते फळाला येत नाहीत. संबंधितांनी या गोष्टीला अजून मान्यता दिलेली नाही. भीमेवरील उजनी प्रकल्पाच्या पाण्याच्या वापराचा मूळ आराखडा बाजूला ठेवून बारामती परिसरातील कारखान्यांना ते पुरविले जाते. हे पाणी पूवेर्कडे मांजरा नदीत सोडावे असाही राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या दोन्ही बाबींना सोलापूर जिल्ह्यातील लोकांचा विरोध आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणी पुणे जिल्ह्यालाच जास्त कसे मिळेल या दिशेने तो प्रकल्प राबविला जातो अशी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी तक्रार करीत असतात. धरण बांधताना त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व पाण्याचा वापर व्हावा अशा दृष्टीने बांधकाम करण्यात आले. त्यानंतर वरच्या भागातील लोक आमच्यासाठी धरणे बांधा अशी मागणी करायला लागले. त्यामुळे बांधलेल्या धरणांना पाणी कमी उपलब्ध होण्याचा धोका निर्माण झाला. पेणगंगा, मुळा आदी नद्यांबाबत असा प्रकार आहे. महाराष्ट्रातील नद्यांच्या पाण्याचा वापर कसा करावा याबाबत चितळे आयोगाने दिलेला अहवाल कोणी विचारात घेतलेला नाही; कारण प्रत्येकाला उसासाठी पाणी हवे आहे. हवे तेवढे ते उपलब्ध होऊ शकत नाही. त्यातूनच पाण्याचे तंटे वाढत जाणार आहेत.

आगामी काळात पाण्यावरून युद्धे व यादवी होतील असे भाकीत काही जाणकार व्यक्त करीत असतात. ब्रह्मापुत्रेबाबत तशी परिस्थिती नाही. चीनने हवे तेवढे घेतले तरी उदंड पाणी त्या नदीला उपलब्ध आहे हे वर सांगितलेच आहे. दोनशे अब्ज घनमीटर पाणी नेण्यासाठी कालवा उपयोगी पडणार नाही. त्यासाठी मोठी नदीच बांधावी लागेल! पर्याय म्हणून नळ घालावे लागतील. मुंबईला पाणी पुरविणारे मोठाले नळ ठाणे-भिवंडी बायपासवर दिसतात. त्यांच्या शंभर पटीहून अधिक नळ चीनला घालावे लागतील आणि हे सर्व परवडेल असा त्या आधी हिशेब करावा लागेल. महाराष्ट्रात कृष्णेवरील ताकारी व तत्सम योजनांमध्ये हे परवडत नाही, हे या संबंधात लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व ध्यानात घेता मूळ विषय मोठी भीती बाळगण्यासारखा नाही.

Tuesday, August 29, 2006

साईबाबांचे सिंहासन सरकारी निर्णयाशी सुसंगतच

साईबाबांच्या सोन्याच्या सिंहासनावर झालेल्या वादानंतर ते न बनवण्याचा शिडीर् संस्थानच्या कार्यकारिणीने घेतला असला, तरी मूळ निर्णय यापूवीर्च्या सरकारी निर्णयाशी सुसंगतच आहे. या संस्थानासाठी सरकारने चालू दशकाच्या आरंभी वेगळा कायदा केला. त्याच्या विधेयकात साईबाबा हे देवता आहेत, असे म्हटले होते. साईबाबांना पाहिलेले लोक अजून हयात आहेत. मग ते देवता कसे? त्यांच्या समाधीवर वास्तू बांधली व ते त्यांचे स्मृतीस्थळ आहे, असे विधेयक तयार करण्यापूवीर्च्या कागदपत्रांमध्ये नमूद होते. असे असता ती इमारत मंदिर कशी होऊ शकते? हे सर्व त्या विधेयकाने केले आहे. साईबाबांना देवता ठरवून मंदिरात बसविणे या सरकारच्या कर्तृत्वाशी सुसंगत असाच हा सोन्याच्या सिंहासनाचा निर्णय होता. तो कायद्याला धरून होता की नाही याबाबत दोन्ही बाजूंनी मत देता येईल, अशी त्यामध्ये शब्दयोजना आहे.

शां. मं. गोठोसकर, मुंबई.

Sunday, August 20, 2006

पवारांची मुलगी हेच क्वालिफिकेशन!

'सुप्रिया मुख्यमंत्री होतील काय?' या शां. मं. गोठोस्कर यांच्या लेखात त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत म्हटल्यावर त्यांना या पदासाठी लागणाऱ्या कोणत्याच गुणांची गरज नाही, असे गृहीत धरले आहे. नाही म्हणायला लेखाच्या शेवटी 'येत्या तीन वर्षांत त्यांनी किमान आवश्यक एवढी तयारी केली पाहिजे' असे म्हटलेले आहे. त्यांनी राजकारणाला आवश्यक तो पेहराव स्वीकारला आहे एवढेच क्वालिफिकेशन लेखकाने सांगितले आहे. पण राजकारणातील अनुभव, राजकीय जाण, परिपक्वता याबाबत मौन पाळले आहे. संपूर्ण लेखाचा रोखच असा आहे की, जणू जनतेने महाराष्ट्र राज्य पवार घराण्याला आंदण देऊन टाकले आहे. निवडणुकीला अद्याप तीन वषेर् बाकी असताना जनतेला गृहीत धरून मुख्यमंत्र्यांचे नाव मुक्रर करून टाकणे हा जनतेचा उपमर्द आहे.

रजनीकांत शेट्ये, अंधेरी