Saturday, February 21, 2009

उडिपी हे तुळूभाषक, कन्नड नव्हेत!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून उभय राज्यांमध्ये वातावरण संतप्त असून जाळपोळ व तोडफोड चालू आहे. तीस वर्षांपूर्वी अशीच तंग स्थिती निर्माण झाली तेव्हा महाराष्ट्रात शिवसैनिकांनी उडिपी हॉटेलांवर हल्ले केले होते. त्या हॉटेलांचे मालक कन्नड आहे, असे त्यांनी गृहीत धरले होते, पण ते खरे नव्हे.

महाराष्ट्रात ज्यांना उडिपी म्हणून ओळखले जाते त्यांची मातृभाषा तुळू असून ती कोणत्याही भाषेची बोलभाषा नाही. तिला स्वतंत्र असा मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ऐश्वर्या राय व शिल्पा शेट्टी या अभिनेत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांची ही मातृभाषा आहे. मुंबईतील एकूण ३४ विधानसभा सदस्यांपैकी तिघे शेष्ी असून ते तुळूभाषिक आहेत. कर्नाटकाचे दक्षिण कन्नड व उडिपी जिल्हे (कुंदापूर तालुका वगळून) यांमध्ये तुळू लोक मोठय़ा बहुसंख्येने आहेत. तो प्रदेश तुळूनाड म्हणून ओळखला जातो.

राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात तुळूचा समावेश नसला तरी त्यातील चार-पाच भाषांपेक्षा तुळू अधिक प्रगत आहे. तुळूमध्ये कथाकादंबऱ्या व मासिके प्रसिद्ध होतात. तुळू साहित्य अकादमी नावाची बिनसरकारी संस्था कार्यरत आहे. हे पाहता तिचा आठव्या परिशिष्टात समावेश व्हायला हवा. तथापि, तुळू मंडळीच यासाठी आग्रही नाहीत असे दिसते.

तुळूनाड हे वेगळे राज्य झाले तर क्षेत्रफळ व लोकसंख्या यांबाबत ते गोव्याच्या दुपटीहून मोठे होईल.उडिपी हॉटेल चालविणारे हे कन्नड नाहीत हे यावरून लक्षात येईल. खरे म्हणजे त्यांच्या महाराष्ट्रातील- विशेषत: मुंबईतील- संस्थांनी हे जाहीरपणे सांगायला हवे. तसे केले तर कन्नड वेदिकेचे लोक कर्नाटकात तुळू भाषकांवर हल्ले करतील अशी त्यांना भीती वाटत असावी.

शां. मं. गोठोसकर, वडाळा, मुंबई
Click here to read this letter on Loksatta.com

No comments:

Post a Comment