Showing posts with label Mumbai. Show all posts
Showing posts with label Mumbai. Show all posts

Monday, February 13, 2012

मतदारांपुढे मुख्य प्रश्न कोणते?



मुंबई महापालिकेची निवडणूक

शां. मं. गोठोसकर, सोमवार, १३ फेब्रुवारी २०१२

alt
मुंबई महापालिकेच्या सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रचारात सत्तारूढ शिवसेना-भाजप युतीच्या विरोधकांनी ‘भ्रष्टाचार’ हा मुख्य मुद्दा केलेला आहे. गेल्या पावसाळ्यात या महानगरातील रस्त्यांना फार खड्डे पडले. युतीचा भ्रष्टाचार हेच या दुरवस्थेचे कारण आहे असा विरोधकांचा आरोप आहे. खरे म्हणजे भ्रष्टाचार हा सबंध देशालाच लागलेला रोग आहे. उद्धव ठाकरेंनी ‘करून दाखवलं’ असे आपल्या प्रचाराने घोषवाक्य करताच ‘चरून दाखवलं’ अशी त्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. चरण्यासाठी म्हणजे पसे खाण्यासाठी केंद्र सरकार हे सर्वात मोठे कुरण आहे. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी स्पेक्ट्रम घोटाळा होऊच कसा दिला या प्रश्नावर संमिश्र सरकारमध्ये असे अपरिहार्यपणे घडते, असे त्यांनी उत्तर दिले.
केंद्र सरकारनंतर राज्य सरकार नावाच्या कुरणांचा क्रम लागतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्व राज्यांमध्ये सुमारे ५०० मंत्रिमंडळे होऊन गेली. त्यापकी जास्तीत जास्त २५ भ्रष्टाचारमुक्त होती असे म्हणता येईल. एक आंतरराष्ट्रीय संघटना जगातील राष्ट्रांचा कमी भ्रष्टाचारापासून जास्तपर्यंत असा क्रम लावते.  त्यामध्ये फार भ्रष्ट राष्ट्रांमध्ये भारताची गणना होते. आपल्या देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्राची स्थिती अशीच आहे.  हे सरकार चालविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छपणे चालविला जाईल यावर शेंबडे पोरसुद्धा विश्वास ठेवणार नाही. मुंबई काँग्रेसला तिच्या अखत्यारीत वेगळे कुरण हवे एवढाच या निवडणुकीतील तिच्या आटापिटय़ाचा अर्थ आहे.
मुंबईतील खड्डय़ांबाबत शिवसेनेचा खुलासा विचारात घ्यावयास हवा. महापालिकेशिवाय राज्य सरकारच्या तीन यंत्रणांचेही रस्ते येथे आहेत. त्यांच्या रस्त्यांवरही खड्डे पडले, पण ते पालिकेचे आहेत असे समजून नागरिक युतीलाच दोष देत राहिले. रस्त्यांच्या कामांसाठी अंदाजित रकमांच्या बऱ्याच खाली निविदा भरल्या जातात. सर्वात कमी बोलीची निविदा स्वीकारायची असा नियम सरकारने घालून दिलेला आहे. अंदाजित रकमेच्या जास्तीत जास्त किती निविदा मंजूर करायची याचा नियम आहे, पण कमी किती स्वीकारायची याचा नियम नसल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होते, असा शिवसेनेचा खुलासा आहे. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार अधिकारावर आल्यापासून धरणे, कालवे आदी कामांच्या अंदाजित रकमा मुळातच ५० टक्के वाढविलेल्या असतात. त्यानंतर नियमांतील कमाल मर्यादेपर्यंत निविदा भरल्या जातील याची काळजी घेतली जाते. त्यानंतर मर्जीतील कंत्राटदाराला ते काम मिळते. अशा प्रकारे दुप्पट खर्च होऊनही कामाचा दर्जा सुमारच राहतो. अशी ही आघाडी मुंबई महापालिकेत सत्तेवर आली तर काय अरिष्ट ओढवेल याची यावरून कल्पना केलेली बरी!
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी भरपूर पाणी पुरवण्याचे आश्वासन युतीने दिले होते खरे, पण मध्य वैतरणा प्रकल्प अपरिहार्यपणे वेळीच पुरा होऊ शकला नाही त्यामुळे ते अपुरे राहिले. आता लवकरच तो प्रकल्प पुरा होईल. या निवडणुकीत आघाडी विजयी झाली तर भरपूर पाणी पुरवण्याचे श्रेय ती घेईल हे निश्चित.  भारतातील प्रत्येक खेडय़ात पिण्याचे स्वच्छ पाणी भरपूर पुरवण्याचे आश्वासन १९६२ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने दिले होते ते अजून पुरे झालेले नाही. लोक ते विसरले आहेत असे गृहीत धरून मुंबई काँग्रेसने हा गहजब चालविला आहे.
सबंध मुंबईसाठी विजेचा एकच दर करू, असे आश्वासन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. या महानगरात चार वेगवेगळ्या यंत्रणा वीजपुरवठा करतात. केंद्राच्या वीज कायद्यानुसार वीजधंद्याचे नियमन होते. त्याचा विचार करता, एकच दर ठेवणे केवळ अशक्य आहे. खरे म्हणजे सबंध देशात सर्वात महागडी वीज मुंबईत आहे. तसेच शहर बस सेवेचे सर्वात जास्त दर या महानगरात आहेत. भारतात महावितरणाचे दर सर्वात जास्त, तर सबंध देशातील एस.टी. महामंडळांमध्ये महाराष्ट्राचे दर सर्वाधिक आहेत. 
केंद्र सरकारला मुंबईतून अतिप्रचंड प्रमाणात महसूल मिळतो. परंतु या महानगराच्या विकासासाठी त्या सरकारकडून अत्यल्प निधी उपलब्ध होतो, अशी सातत्याने टीका होते. ती करणाऱ्यांमध्ये राज्य सरकार अग्रभागी असते. परंतु, हे सरकार मात्र या पालिकेला किमान आवश्यक एवढा निधी देत नाही. या प्रकरणी मोठी मूलभूत अडचण आहे. राज्यघटनेच्या ३७१ कलमामध्ये या राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र (म्हणजे पश्चिम महाराष्ट्र) असे तीन विभाग कल्पिलेले असून त्यांवर समन्यायानुसार विकासखर्च झाला पाहिजे असा दंडक आहे. याचा अर्थ असा की, राज्य सरकारच्या महसुलात मुंबईतून अतिप्रचंड प्रमाणात भर पडत असली तरी या महानगराच्या विकासाला पश्चिम महाराष्ट्राच्या वाटय़ातून पसे मिळतात.  अर्थातच, ते तोकडे असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर राज्यघटनेतील समन्यायामुळे मुंबईवर अन्याय होत आहे. महाराष्ट्राच्या निधीतून मुंबईच्या विकासासाठी किमान आवश्यक एवढा निधी काढून बाकीची रक्कम उर्वरित कोकण, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा यांवर समन्यायानुसार वाटली पाहिजे. आघाडी, युती व मनसे यांच्या जाहीरनाम्यांमध्ये या विषयाचा ऊहापोह व्हायला हवा होता, पण एकानेही या अतिमहत्त्वाच्या बाबीकडे लक्ष दिलेले नाही.
मुंबईत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील चार यंत्रणा, राज्य सरकार व महापालिका यांची रुग्णालये आहेत. त्यामध्ये राज्य सरकारच्या रुग्णालयांचा दर्जा फारच खालचा आहे. हा दर्जा वर आणण्याचे वचन आघाडीने का दिले नाही?  देणार कशी? कारण राज्य सरकारच्या तिजोरीत तर खडखडाट आहे. अशा अवस्थेत मुंबईसाठी आपण काही करू ही आघाडीच्या जाहीरनाम्यातील वचने म्हणजे शुद्ध भूलथापा आहेत.
मुंबईचा खरा राजकीय प्रश्न येथे लक्षात घेतला पाहिजे. भारतातील अब्जाधीशांपकी बहुसंख्य मुंबईत राहतात. काही अपवाद वगळता बाकीचे सर्व अमराठी आहेत.  त्यामुळे येथील मराठी लोक आíथकदृष्टय़ा दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत असे हे अमराठी समजतात. याउलट हे अमराठी लोक भाषिक अल्पसंख्य असल्यामुळे राजकीयदृष्टय़ा ते दुय्यम दर्जाचे नागरिक ठरतात.  मुंबईत बहुसंख्येने असलेले हे धनवान अमराठी लोक हा राजकीय दर्जा किती काळ सहन करतील?  राज्यपुनर्रचनेपूर्वी संकल्पित मराठी राज्याला मुंबई देण्याला या मंडळींचा विरोध होता. तीन दशकांनंतर मुंबई काँग्रेसचे त्या वेळचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी ही गोष्ट मनावर घेतली. या महापालिकेच्या १९८५ सालच्या निवडणुकीवेळी काँग्रेसकडून कमीत कमी मराठी उमेदवार उभे करायचे आणि पालिकेत काँग्रेसच्या अमराठी नगरसेवकांचे बहुमत झाले की तेथे मुंबईचे वेगळे राज्य करण्याचा ठराव करून घ्यायचा असा डाव देवरांनी योजला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी तो ओळखला. त्यांनी आपले व राज्य सरकारचे सारे बळ शिवसेनेमागे उभे केले. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होऊन शिवसेना प्रथमच बहुमताने महापालिकेत सत्तारूढ झाली. अशा प्रकारे वसंतदादांनी मुंबई वाचवली. 
आता देवरांची जागा कृपाशंकरांनी घेतली आहे. फरक एवढाच की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर त्यांना मुंबईच्या वेगळ्या राज्यात ते पद हवे आहे. या निवडणुकीनंतर पालिका काँग्रेस पक्षात कमीत कमी मराठी नगरसेवक राहतील याची त्यांनी काळजी घेतली. तिला अजित सावंतांनी आक्षेप घेताच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. हे सर्व करताना पृथ्वीराज व माणिकराव ठाकरे यांना कृपाशंकरांनी काखोटीला मारले होते. निवडणुकीनंतर शिवसेना इतिहासजमा होईल असे भाकीत पृथ्वीराजांनी केले आहे. अल्पशिक्षित वसंतदादा आणि उच्चविद्याविभूषित पृथ्वीराज यांच्या जाणतेपणातील फरक येथे लक्षात भरतो. मुंबईचे राजकारण कशाशी खातात याची पृथ्वीराज व माणिकराव यांना काडीमात्र जाणीव नाही हे स्पष्ट झाले आहे. मुंबईत सतत लोंढे आणत राहणे हा कृपाशंकरांच्या राजकारणाचा स्थायिभाव आहे. कायदा करून या लोंढय़ांना थोपवणे शक्य आहे, पण पृथ्वीराजबाबांना कोण रोखत आहे हे सांगू शकतील.
अशा या संकटप्रसंगी मुंबईतील सर्व मराठी लोकांची एकजूट व्हायला हवी, पण ते तर शिवसेना व मनसे यांमध्ये विभागलेले आहेत. या दोन्ही पक्षांचे ऐक्य व्हावे अशी मराठी लोकांची अंतरीची तळमळ आहे. पण तसे ग्रह जुळून येत नाहीत, कारण कृपाशंकरांचे ग्रह उच्चीचे आहेत ना?

Monday, December 29, 2008

मुंबई वाचवायची कशी? उत्तरच नाही!

शां. मं. गोठोसकर


पाकिस्तान सरकारच्या मनात असले तरी दहशतवाद्यांवर त्यांचे किमान आवश्यक एवढेसुद्धा नियंत्रण चालत नाही. युद्ध पुकारून दहशतवाद्यांचा बीमोड करायचा तर अणुबॉम्बधारी दोन राष्ट्रांच्या दरम्यान अजून युद्ध झालेले नाही, हे यासंदर्भात लक्षात घेतले पाहिजे. हे पाहता पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून सतर्क राहणे एवढेच आपल्या हाती शिल्लक उरते.

........

गेल्या २६ नोव्हेंबरला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण हल्ला केला त्या घटनेला महिना उलटला तरीही त्यावर जोरदार चर्चा चालू आहे. असा हल्ला टाळण्यात किंवा त्यांच्याशी मुकाबला करण्यात आपण कमी कोठे पडलो, त्रुटी काय होत्या, पूर्वसूचना मिळाली होती की नाही, केंद व महाराष्ट्र सरकारांच्या संबंधित विविध यंत्रणांमध्ये समन्वय होता की नाही आदी बाबींवर ही चर्चा होत आहे. पुन्हा असा हल्ला झाला तर त्याला तोंड देण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा असावी या दिशेने आता वाटचाल होत आहे. त्याला अनुरूप असे कायदेही तात्काळ तयार करण्यात आले आहेत. तथापि, असे हल्ले पुन्हा होऊ नयेत म्हणून काय करता येईल याचा अजून विचार झालेला नाही. न्यूयॉर्कमधील र्वल्ड ट्रेड सेंटरच्या दोन उत्तुंग इमारतींवर २००१ साली अल् कायदा या जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यानंतर अमेरिकेने योग्य पावले टाकल्यामुळे अजून अशा स्वरूपाचा हल्ला त्या राष्ट्रात पुन्हा झालेला नाही. अन्य काही राष्ट्रांनीही अशीच पुरेशी काळजी घेतली आहे. त्या दिशेने केंद व महाराष्ट्रन् सरकारांनी कसलेही पाऊल टाकलेले नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मुंबई वाचवायची कशी याचा ही सरकारे शोधच घेत नाहीत, उत्तर सापडणे तर दूरच राहो.

दहशतवाद्यांचे पुन्हा हल्ले होण्याचा संभव आता वाढलेला आहे. याचे कारण म्हणजे या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व इस्त्रायल यांचे साह्य भारत घेण्याची शक्यता आहे हे होय. ही राष्टे आपली शत्रू आहेत असेच मुस्लिम जगत धरून चालते. मुंबईवरील हल्ल्यांबाबत जगभर अतितीव्र प्रतिक्रिया उमटल्या. फक्त मुस्लिम राष्ट्रांनी तसे केले नाही. आता भारताने याबाबत काही पावले टाकताना या तीन राष्ट्रांच्या कच्छपी लागता कामा नये असे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानला काही समज देण्याचा या मुस्लिम जगताचा मुळीच विचार नाही. त्यांचा हितोपदेश केवळ भारतालाच आहे. काश्मीर प्रश्ान्, बाबरी मशीद उद्ध्वस्त होणे व गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगली या कारणांनी सूड घेण्यासाठी तरुणांना पेटवून दहशतवादी म्हणून तयार केले जाते. त्यात आता अमेरिका व ब्रिटन यांचे सहकार्य घेणे याची भर पडत असल्याने आणखी हल्ले करण्यासाठी दहशतवादी उद्युक्त होणार आहेत.

पाकिस्तान दहशतवाद्यांना रोखत नाही हे खरे आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या राष्ट्रांतील शक्तिस्थाने वेगवेगळी आहेत हे होय. सरकार, सेनादल, आयएसआय (मुख्य गुप्तचर संघटना) व दहशतवादी संघटना अशी ही चार शक्तिस्थाने त्या राष्ट्रामध्ये आहेत. त्याशिवाय तालिबान व अल् कायदा यांच्या ताब्यात निम्मेअधिक वायव्य सरहद्द प्रांत आहेच. अशा परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकारच्या मनात असले तरी दहशतवाद्यांवर त्यांचे किमान आवश्यक एवढेसुद्धा नियंत्रण चालत नाही. युद्ध पुकारून दहशतवाद्यांचा बीमोड करायचा तर अणुबॉम्बधारी दोन राष्ट्रांच्या दरम्यान अजून युद्ध झालेले नाही, हे यासंदर्भात लक्षात घेतले पाहिजे. (कारगिलच्या युद्धात आपण नव्हतोच अशी भूमिका पाकिस्तानने त्यावेळी घेतली होती.) हे पाहता पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून सतर्क राहणे एवढेच आपल्या हाती शिल्लक उरते.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी स्थापन करण्यासाठी केंद सरकारने नुकताच एक खास कायदा केला. तसेच, अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रीव्हेन्शन अॅक्टमध्ये काही दुरुस्त्या केल्या. यामुळे काही अधिकार वाढले हे खरे, परंतु पुन्हा असे हल्ले होऊ नयेत यासाठी या कायद्यांचा काहीच उपयोग नाही. उद्या या दहशतवाद्यांनी रासायनिक किंवा जैवशास्त्रीय शस्त्रे वापरली तर काय होईल? एकटा दहशतवादी रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्सचा मारा करू शकतो. ताजमहाल हॉटेलच्या गच्चीवरून असा मारा झाला तर दक्षिण मुंबई उद्ध्वस्त होऊन जाईल. तसेच, एकटा दहशतवादी स्टिंगर मिसाइलचा वापर करू शकेल. मुंबईवरील हल्ल्यावेळी नरिमन हाऊसच्या गच्चीवर हेलिकॉप्टरमधून नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे कमांडो उतरले. तेथील दहशतवाद्यांकडे स्टिंगर मिसाइल असते, तर ते हे हेलिकॉप्टर सहज पाडू शकले असते. कारगिल युद्धात भारताची विमाने पाकिस्तानने पाडली ती विमानविरोधी तोफांमुळे नव्हे तर स्टिंगर मिसाइलचा वापर त्यासाठी झाला होता. परिस्थिती किती भीषण आहे याची यावरून कल्पना येईल.

मुंबईतील हा नवा दहशतवादी हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीहून एनएसजीचे कमांडो येथे पोचले. त्यांनी तात्काळ ताजमहाल, ओबेराय व नरिमन हाऊस येथे मुकाबला सुरू केला. तशा स्वरूपाची महाराष्ट्र सरकारची यंत्रणा तयार करण्याचा निर्णय झाला असून त्याचे नाव 'फोर्स-१' असे राहणार आहे. नक्षलवाद्यांना तोंड देण्यासाठी आंध्र सरकारने ग्रेहाऊंड नावाचे दल उभारले आहे. ते एनएसजीच्या धतीर्वर बनलेले आहे. एनएसजीचे स्पेशल अॅक्शन ग्रुप व स्पेशल रेंजर्स ग्रुप असे दोन भाग आहेत. त्यातील पहिला विशेष महत्त्वाचा आहे. फोर्स-१ तसे बनले पाहिजे. एनएसजीचे एक केंद मुंबईत ठेवायचे असा केंद सरकारचा आता निर्णय झालेला आहे. एनएसजीसाठी दिल्लीजवळ मनसेर येथे खास प्रशिक्षण केंद आहे. ते अत्युत्तम उभारलेले आहे. महाराष्ट्र सरकारनेही फोर्स-१ साठी असे एक केंद स्थापन करावयास हवे. हल्ला होताच असे दल तात्काळ वापरणे शक्य होईल. तथापि, हल्ला होऊच नये यासाठी त्याचा उपयोग होऊ शकत नाही.

न्यूयॉर्कमधील र्वल्ड ट्रेड सेंटरवरील अल् कायद्याच्या हल्ल्यानंतर असे हल्ले पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घेण्यासाठी अमेरिकेच्या सरकारने होमलॅण्ड सिक्युरिटी ही नवीन खास यंत्रणा तयार केली. ती फार कार्यक्षमतेने काम करीत असल्यामुळे त्या देशात पुन्हा असा हल्ला झालेला नाही. अन्य काही महत्त्वाच्या देशांनी अशीच काळजी घेतली आहे. हल्ले कशा प्रकारे होण्याचा संभव आहे हे हेरून ते होऊ नयेत यासाठी सतर्क राहणे, हे होम सिक्युरिटीसारख्या यंत्रणांचे काम असते. उदाहरणार्थ, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील मॅरिअट या सर्वात महत्त्वाच्या हॉटेलवर गेल्या वषीर् दहशतवादी हल्ला होऊन त्याचा काही भाग उद्ध्वस्त झाला. त्यानंतर असा हल्ला मुंबईत ताजमहाल व ओबेराय या हॉटेलांवर होऊ शकतो असे हेरून त्याप्रमाणे काळजी घ्यायला हवी होती. पण त्यासाठी आवश्यक ती यंत्रणाच आपल्याकडे नाही. महाराष्ट्र सरकारने स्टेट सिक्युरिटी कौन्सिल स्थापन केले असले तरी दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी त्या कौन्सिलचा काही उपयोग नाही.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर या महानगरातील वरच्या थरातील नागरिक महाराष्ट्र सरकारविषयी नाराज आहेत. मुंबई हे दहशतवाद्यांचे कायम लक्ष्य झाल्यास या महानगराची अवस्था बैरूट, काबूल, बगदाद आदींसारखी होईल, अशी त्यांना भीती वाटते. त्या शहरांतील कंपन्या व उद्योगपती यांच्याशी धंदा करायला इतर जगातील मंडळी तयार नसतात तशीच अवस्था मुंबईची होईल, अशी चिंता येथील उद्योगपतींना वाटते. राज्य सरकारला मुंबईचा कारभार कार्यक्षमपणे व काळजीपूर्वक चालवता येत नसेल तर या महानगराचे वेगळे राज्य नको, पण स्थानिक पातळीवर पुरेसे अधिकार तरी प्रदान करा, असे त्यांचे म्हणणे आहे. यापुढे दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी सतर्क राहण्याची यंत्रणा राज्य सरकारने उभारणे कसे अत्यावश्यक बनले आहे, याची यावरून कल्पना येईल.

Friday, February 15, 2008

मुंबईतील 'राड्या'चे अपुरे विश्लेषण

शां. मं. गोठोसकर


मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, तिचे वेगळे राज्य करावे, अशी मागणी राज्य पुनर्रचनेपूवीर् मुंबईतील बिगरमराठी करीत होते. हे शहर चालवणे मराठी राज्यर्कत्यांना जमणार नाही, ते मुंबईचा निकाल लावतील, असे त्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात या बिगरमराठी लोंढ्यांमुळेच मुंबईचा निकाल लागण्याची वेळ आली आहे.

.......

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील उत्तर भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेचे व केलेल्या 'राड्या'चे प्रयोजन काय याला मराठी वर्तुळातून एकच उत्तर सांगण्यात आले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांशी मनोमीलन करून आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत होते, त्याला राज ठाकरे यांनी छेद देण्याची ही संधी घेतली. या संबंधात महाराष्ट्राबाहेरचे उत्तर भारतीयांचे नेते आणि इंग्रजी वृत्तपत्रे यांनी या राड्याचा निषेध केला असून, यामुळे राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येत आहे, अशी भीती व्यक्त केली आहेे. या प्रकरणी खरा प्रश्न वेगळाच आहे हे पूर्वपीठिका पाहिल्यास लक्षात येते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रथम राज्यघटना तयार झाली आणि त्यानंतर राज्य पुनर्रचना करण्यात आली. पुढे आणखी थोडे बदल झाले. या एकूण घडामोडींमध्ये बिगरहिंदी भाषांसाठी प्रत्येकी एकेक राज्य तर हिंदी भाषिकांसाठी नऊ राज्ये तयार झाली. या भाषावार राज्यांमध्ये राहणाऱ्यांनी ते राज्य आपलेच आहे असे समजू नये, ते उपराष्ट्र आहे असे मानू नये आणि असे प्रत्येक राज्य साऱ्या भारताचेच राहील, असे राज्य पुनर्रचना आयोगाने १९५५ सालच्या आपल्या अहवालात म्हटले होते. तथापि, बिगरहिंदी राज्ये ही प्रत्यक्षात उपराष्ट्रे बनली. हिंदी भाषिक राज्ये मात्र खरी राज्ये राहिली.

बहुतेक सर्व बिगरहिंदी राज्यांमध्ये राष्ट्रगीतासारखे राज्यगीत आहे. उदाहरणार्थ, आपले महाराष्ट्रगीत सांगता येईल. संबंधित राज्य सरकारांनी त्यांना तशी मान्यता दिलेली नसली, तरी त्या राज्यांतील लोक तसे धरून चालतात. हिंदी राज्यांपैकी एकाकडेही असले गीत नाही. सभा किंवा समारंभ संपल्यावर 'जय हिंद, जय महाराष्ट्र' अशा प्रकारचा घोष प्रत्येक बिगरहिंदी राज्यात होत असतो, पण 'जय हिंद, जय उत्तर प्रदेश' अशासारखा होत नाही. या उपराष्ट्रांमध्ये त्या राज्यांच्या अधिकृत भाषांचे नागरिक ते राज्य आपलेच आहे असे मानू लागले. त्या राज्यांतील भाषिक अल्पसंख्याक प्रत्यक्षात राजकीयदृष्ट्या दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत, असे अधिकृत भाषांचे नागरिक मानू लागले. असे दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणजे काय, हे समजण्यासाठी केंदीय मंत्री मुरली देवरांचे उदाहरण देता येईल. ते मुंबईचे महापौर झाले व पुढे या महानगरातून अनेकदा लोकसभेवर निवडून आले; पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. याचे कारण राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात ते दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत. (दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणजे काय हे समजावे यासाठी केवळ देवरा यांचे उदाहरण दिले आहे. त्यामागे अन्य कसलाही हेतू नाही). दोन-तीन बिगरहिंदी राज्यांमध्ये त्या भाषेचा नसलेला राजकारणी मुख्यमंत्री झाल्याची उदाहरणे आहेत; पण ते अपवाद नियम सिद्ध करण्यासाठी आहेत असे समजावे. त्या संबंधित व्यक्ती मुख्यमंत्री होण्यापूवीर् त्या राज्याच्या समाजजीवनात पूर्ण मिसळून गेल्या होत्या. हिंदी राज्यांमध्ये तेथील भाषिक अल्पसंख्याक हे राजकीयदृष्ट्या दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत, असे समजले जात नाही, हे या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.

हिंदी भाषिक राज्यांतील लोक बिगरहिंदी राज्यांत स्थायिक व्हायला जातात, तेव्हा त्यांना नवी भाषा शिकण्याची गरज आहे, असे वाटत नाही. राष्ट्रभाषा म्हणून त्या बिगरहिंदी राज्यांतील लोक हिंदी शिकलेलेच असतात, मग आपणाला त्या राज्याची भाषा शिकण्याची गरज काय, असे त्यांना वाटते. मुंबईबाबत तर असे आहे की, राज्य सरकार मराठीबाबत कसलाच आग्रह धरत नाही. मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे, असा कायदा १९६४ साली केल्यावर ४४ वर्षांत त्याचा पूर्ण विसर पडला. त्यामुळे मुंबईत स्थायिक होणाऱ्या उत्तर भारतीयांना त्याची जाणीव होत नाही. ते मग मागणी करतात की, मुंबई महापालिकेची व्यवहाराची भाषा मराठीऐवजी हिंदी असावी!

मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना आवर कसा घालायचा, हा प्रश्न गेली काही दशके सतावत आहे. भारताच्या कोणाही नागरिकाला या देशात कोठेही स्थायिक होण्याचा अधिकार राज्यघटनेच्या १९व्या कलमानुसार दिलेला असल्यामुळे या लोंढ्यांना अटकाव करता येणार नाही असे सांगितले जाते. ते पूर्ण खरे नाही. सार्वजनिक हितार्थ त्यावर सरकार बंधने घालू शकेल, असे त्याच कलमाच्या शेवटी म्हटले आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकार कायदा करू शकेल. तो मुंबई महानगर प्रदेशासाठी केला पाहिजे. भौगोलिक मर्यादा आणि किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरविण्याबाबत असमर्थता ही असा कायदा करण्यासाठी सार्वजनिक हिताची सबळ कारणे ठरू शकतात. मुंबईत झोपडपट्ट्यांत राहणाऱ्यांची टक्केवारी वाढतच आहे. ती रोखणे व कमी करणे मुंबईचे शांघाय करण्याआधीची पूर्वअट समजली पाहिजे. लोंढ्यांना आवर घालणारा कायदा केल्याविना हे शक्य होणार नाही. दिल्लीत प्रत्येकाकडे ओळखपत्र असले पाहिजे अशा आशयाचा विचार तेथील मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी अलीकडेच बोलून दाखविला होता. गोव्यातही लोंढे रोखण्याचा विचार बळावत असून, तेथे सेझ रद्द होण्यामागे तेच महत्त्वाचे कारण होते. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, तिचे वेगळे राज्य करावे, अशी मागणी राज्य पुनर्रचनेपूवीर् या महानगरातील बिगरमराठी करीत होते. हे शहर चालवणे मराठी राज्यर्कत्यांना जमणार नाही, ते मुंबईचा निकाल लावतील, असे त्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात या बिगरमराठी लोंढ्यांमुळेच मुंबईचा निकाल लागण्याची वेळ आलेली आहे. उपराष्ट्र ही संकल्पना, त्यातून निर्माण झालेले भेद व मुंबईच्या मर्यादा यांची योग्य ती जाणीव हिंदी भाषिकांचे उत्तर भारतातील नेते व इंग्रजी वृत्तपत्रे यांना नसल्यामुळे ते राष्ट्रीयत्वाचे डोस महाराष्ट्राला पाजत आहेत.

प्रथम व दुय्यम दर्जाचे नागरिक या भेदाला आणखी एक महत्त्वाचा पदर आहे. आपल्या देशातील धनिकांपैकी सर्वात जास्त मुंबईत राहतात. मुंंबईतील धनिकांपैकी बहुतेक सारे बिगरमराठी आहेत. या महानगरात आपण आथिर्कदृष्ट्या प्रथम दर्जाचे नागरिक असून, मराठी लोक दुय्यम दर्जाचे आहेत असे ते फार पूवीर्पासून मानतात. मराठी राज्यर्कत्यांना मुंबईवर कारभार करणे जमणार नाही, असे हे बिगरमराठी धनिक राज्य पुनर्रचनेपूवीर् म्हणत होते, त्याचे हे खरे कारण आहे. या महानगरातील बड्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर मराठी व्यक्ती अभावानेच आढळतात. कोलकाता येथील बिगरबंगाली मालकीच्या कंपन्यांवर बंगाली संचालक असतात. चेन्नईमध्ये अशा कंपन्यांवर तामिळ संचालक असतात. हैदराबाद, बंेगळुरू आदी ठिकाणी असेच आहे. आश्चर्य म्हणजे मुंबईतील परदेशी कंपन्यांच्या संचालक मंडळावरही मराठी व्यक्ती नसतात. स्थानिकांना डावलणे, असा प्रकार भारतात अन्यत्र असलेल्या परदेशी कंपन्यांबाबत आढळत नाही. मुंबईत मराठी लोकांवर होणारा हा अन्याय दूर व्हावा यासाठी झटणार तरी कोण? सिकॉम ही महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारात असली तरी ती सरकारी कंपनी नाही. तिच्यावर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांसह पाचजण नेमण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. सध्या हे सर्व पाचजण बिगरमराठी आहेत! मुंबईत सर्व नागरिक सौहार्दाने राहण्यासाठी ही आथिर्क दरी नाहीशी होण्याकरिता प्रयत्न व्हावयास हवेत. त्याचा प्रारंभ संचालक मंडळावर मराठी व्यक्ती घेण्यापासून व्हावयास हवा. आपण राजकीयदृष्ट्या दुय्यम दर्जाचे नागरिक आहोत, ही गोष्ट मुंबईतील बिगरमराठी मंडळी फार काळ सहन करणार नाहीत. दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाची नेमणूक होणारच नाही, असे कोणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. त्यामुळे मुंबईच्या राजकीय भवितव्याला ग्रहण लागण्याचा धोका संभवतो. मुंबईसह महाराष्ट्रातील जाणत्या मराठी मंडळींनी याचा गंभीरपणे विचार करून यापुढे कोणती पावले टाकली पाहिजेत हे ठरविले पाहिजे. 'राज विरुद्ध उद्धव' एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून या राड्याकडे पाहता कामा नये.

Wednesday, January 24, 2007

मुंबईच्या प्रश्ानंकडे दुर्लक्ष

शां. मं. गोठोसकर

रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे मुंबईर्त येत राहिल्यास, कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी महापालिका किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा, अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला, तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करावी.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रस्तृत केलेल्या जाहीरनाम्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या मूलभूत बाबीकडे लक्ष दिलेले दिसत नाही. या महानगरात नागरी सुविधा पुरविणे ही महापालिकेची मुख्य जबाबदारी आहे. पण येथे रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे स्थायिक होण्यासाठी येत राहिल्यास, महापालिकेला कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी ती किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. या देशातील ''सर्व नागरिकांस भारताच्या कोणत््याही राज्यक्षेत्रात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार असेल'', असे राज्यघटनेच्या १९व्या कलमात म्हटलेले आहे. तथापि, सार्वजनिक हितार्थ त्यावर मर्यादा घालण्याचा कायदा सरकारला करता येईल, असेही त्यामध्ये सांगितले आहे. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी.

मुंबईच्या विकासखर्चाला पैसा फार अपुरा पडतो. त्यासंबंधात राज्य सरकारपुढे घटनात्मक अडचण आहे. महाराष्ट्रात विकासखर्चाचे वाटप कसे करायचे याचा दंडक राज्यघटनेच्या ३७१ कलमाने घालून दिला आहे. त्यामध्ये या राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित (म्हणजे पश्चिम) महाराष्ट्र असे तीन प्रदेश कल्पिले असून त्यांवर समन्यायानुसार खर्च झाला पाहिजे, असे सांगितले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीतून मुंबईचा विकासखर्च भागवायचा, असा याचा अर्थ होतो. राज्य सरकारच्या महसुलात मुंबई महानगर प्रदेशाचा हिस्सा ८० टक्क्यांहून अधिक आहे. असे असताना त्याच्या विकासखर्चासाठी लागणारे पैसे मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या हिश्श्यातून घ्यायचे, हीच बाब मुळात समन्यायानुसार नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीपैकी बराच मोठा भाग या प्रदेशातील विशेष राजकीय ताकद असलेले जिल्हे आपल्याकडे ओढून घेतात. त्यामुळे मुंबईच्या वाट्याला किमान आवश्यक एवढासुद्धा निधी मिळू शकत नाही. मग कोकणच्या वाट्याचे पैसे मुंबईवर खर्च करायचे, असा हा प्रकार गेली ४६ वषेर् चालू आहे. प्राथमिक शिक्षणावरील खर्च ही राज्य सरकारची जबाबदारी असते. मुंबई महापालिका त्यावर वर्षाकाठी चारशे कोटी रुपये खर्च करते. त्यातील काहीसुद्धा हिस्सा महाराष्ट्र सरकार उचलत नाही. मग रस्त्यांसाठी खर्च करायचे काही पैसे प्राथमिक शिक्षणावर खर्च केले जातात. अशा परिस्थितीत रस्त्यात खड्डे पडणार नाहीत तर काय होणार? हा अन्याय दूर होण्यासाठी महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, मुंबई महानगर प्रदेश, उर्वरित कोकण व उर्वरित पश्चिम महाराष्ट्र असे पाच विभाग कल्पिले पाहिजेत. मुंबई महानगर प्रदेशावर रास्त विकासखर्च करून बाकीच्या निधीचे उर्वरित चार विभागांवर समन्यायानुसार वाटप व्हावयास हवे. अशी व्यवस्था झाली तरच राज्य सरकारच्या तिजोरीतून अन्याय न होता मुंबईसाठी पैसा मिळू शकेल.

लोंढे वाढून दिल्ली बकाल होऊ नये म्हणून तिच्या आसमंतासह प्रदेशाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी प्रदेश कल्पिण्यात आला. त्याकरिता केंद सरकारच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो. या सरकारच्या तिजोरीत सर्वात जास्त भर मुंबईतून पडत असते. याचे कारण हे महानगर ही भारताची आथिर्क राजधानी आहे. यास्तव, मुंबई महानगर प्रदेश हा राष्ट्रीय आथिर्क राजधानी प्रदेश आहे, असे कल्पून त्याच्या विकासासाठी केंद सरकारच्या तिजोरीतून निधी उपलब्ध व्हावयास हवा. हे साध्य होण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्ताव मांडून त्यासाठी जोर लावला पाहिजे. पण जाहीरनामे पाहता, निधी उपलब्ध करणे ही बाब कोणाच्याही गावी नाही असे दिसते. अन्य महानगरांतील उपनगर रेल्वे तोट्यात असून मुंबईची नफ्यात आहे. इतर ठिकाणचा तोटा मुंबईने भरून द्यायचा असा हा प्रकार आहे. आता तर इतर ठिकाणांपेक्षा मुंबईचे रेल्वेचे दर वाढवायचे असा विचार चालला आहे. हे टाळण्यासाठी आणि या उपनगर रेल्वेचा पुरेशा गतीने विकास होण्यासाठी तिच्याकरिता वेगळे महामंडळ स्थापन होण्याची गरज आहे. त्यासाठी रेटा लावणे ही गोष्ट महापालिकेलाच करावी लागेल, कारण राज्य सरकारचे त्याकडे लक्षच नाही.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात भर घालण्यासाठी मध्य वैतरणा प्रकल्प आता हाती घेण्यात येत आहे. ऊर्ध्व वैतरणा प्रकल्पाचे पाणी पूवेर्कडे वळवून गोदावरी नदीच्या खोऱ्यात सोडावे अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून चालू आहे. त्या खोऱ्यात नेहमीच पाण्याची तीव्र टंचाई असते हे लक्षात घेता, ती मागणी मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. ती मान्य झाल्यास मध्य वैतरणा प्रकल्प रद्द करावा लागेल. महाराष्ट्र पाणी परिषदेचे अध्यक्ष आणि माजी केंदीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील आणि औरंगाबादचे तरुण तुर्क कृष्णा डोणगावकर या प्रश्ान्ी पुढाकार घेऊन रान उठवतील हे निश्चित. जो प्रकल्प पुढे रद्दच होणार आहे, त्यामागे जाण्यात हशील काय? मुंबईकरिता आणखी पाणी उपलब्ध करण्यासाठी अन्य तीन-चार प्रकल्पांचे अंतिम आराखडे तयार आहेत. ते अमलात आणण्याचा विचार एकाही जाहीरनाम्यात नाही, ही खेदाची गोष्ट होय.

नजीकच्या भविष्यकाळात मुंबईवर एक नवे संकट येऊ घातले आहे. केंद सरकार लवकरच दुसरा राज्यपुनर्रचना आयोग नेमणार आहे. असा पहिला आयोग १९५३ साली नेमण्यात आला, तेव्हा मुंबई महानगराचे वेगळे राज्य व्हावे, अशी येथील बहुतेक साऱ्या बिगरमराठी मंडळींची इच्छा होती. त्यांचे खरेखुरे नेतृत्व इंडियन मर्चंट्स चेंबरकडे होते. त्या संस्थेची सध्या शतसंवत्सरी साजरी होत आहे. ती पुन्हा उचल खाणार नाही, याची हमी काय? या महापालिकेत मराठीऐवजी हिंदीचा वापर व्हावा अशी मागणी बिगरमराठी नगरसेवक सातत्याने करीत असतात. मुंबई महापालिकेच्या १९८५ सालच्या निवडणुकीत कमीत कमी मराठी व जास्तीत जास्त बिगरमराठी उमेदवार उभे करावे आणि काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर वेगळ्या राज्याचा ठराव करायचा असे मुंबई काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी गुप्तपणे योजले होते. महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी योग्य ती पावले टाकली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचा पराभव झाला आणि या महापालिकेत शिवसेनेला प्रथमच बहुमत प्राप्त झाले. याबद्दल शिक्षा म्हणून वसंतदादांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले, ही गोष्ट वेगळी! भारतातील दहा राज्ये लोकवस्तीने मुंबईहून लहान आहेत. तसेच, जगातील १९२ पैकी १२६ राष्ट्रे लोकवस्तीने मुंबईहून छोटी आहेत. जगात महानगरांची वेगळी राष्ट्रे व राज्ये असल्याची उदाहरणे आहेत. दुसऱ्या राज्यपुनर्रचना आयोगाकडे बिगरमराठी मंडळी या दिशेने युक्तिवाद करतील. मुंबईचे वेगळे राज्य व्हावे अशी कोणी मागणी केल्यास आपला तिला पाठिंबा राहणार नाही, असे सर्व पक्षांकडून- विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप यांच्याकडून आता जाहीर करून घेणे आवश्यक आहे.

मुंबईकरांनी सतर्क, दक्ष व जागरूक राहून, राजकीय पक्षांना आपल्या जाहीरनाम्यांमध्ये पुरवणी म्हणून वर सुचविलेल्या बाबी समाविष्ट करणे भाग पडले पाहिजे.